दक्षिणगंगा ( गोदावरी )

उगमस्थान : त्र्यंबकेश्वर
लांबी          : 1450 किलोमीटर ( 900 मैल )
उगम स्थान उंची : 1620 मीटर ( 5310 फूट )
सरासरी प्रवाह  : 3505 घन मी/से.
मुख            : काकीनाडा ( बंगालचा उपसागर )
पाणलोट क्षेत्रामधील राज्ये :
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा
उपनद्या      : इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा.

गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असे सुद्धा म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते. भीमा, वैनगंगा, इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.
गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणार्‍या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यांतच वाहून जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर (पूर्व घाट पार करताना) तर काही ठिकाणी ६.५ कि.मी. (समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते. आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यांची जीवनवाहिनी समजतात.


गोदावरी काठावरील महत्त्वपूर्ण शहरे, मानवी वस्ती, संस्कृती
गोदावरी खोऱ्यातील लोक मराठी आणि तेलुगू भाषिक आहेत. निजाम काळात उर्दू भाषेचा वापर शासकीय कामकाजात केला जात असे. भात हे तेलुगू लोकांचे मुख्य अन्न आहे तर ज्वारी हे मराठी लोकांचे मुख्य अन्न आहे. रेल्वे हा या संपूर्ण भागाला जोडणारा प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे.

गोदावरीचे उगमस्थान महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर येथे असून येथील कुशावर्त घाटावर कुंभमेळा भरतो व लाखो भाविक स्नान करतात. त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वरापासून जवळ असलेले नाशिक औद्योगिक शहर आहे. पैठण येथील जायकवाडी सिंचन प्रकल्प अशियातील सर्वांत मोठा मातीचा बंधारा ( धरण ) आहे. पैठण हे धार्मिक महत्त्वाचे स्थान असून येथे जायकवाडी धरणाच्या पार्श्वभूमीवर नयन रम्य उद्यान आहे. नांदेड येथे शीख समुदायाचा एक प्रमुख गुरुद्वारा असून शिखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंग यांचे नांदेड येथे निधन झाले होते.

आंध्रप्रदेशात कंदाकुर्ती येथे मंजिरा नदी, हरिद्रा नदी या उपनद्यांचा गोदावरीशी त्रिवेणी संगम होतो. या सुंदर संगमावर आंतरराज्य पूल आहे. शिवालय व स्कंद आश्रम नावाची प्राचीन देवालये आहेत. बासर येथे देवी सरस्वतीचे मंदिर असून, धर्मापुरी (करीमनगर जिल्हा) हेसुद्धा प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. पट्टिसीमा ह्या नयनरम्य स्थळी गोदावरी नदीच्या मधोमध देवकूट डोंगरावर वीरभद्र मंदिर आहे. भद्राचलम्‌ येथेही श्री‍रामाचे सुंदर मंदिर आहे. राजमहेंद्री हे गाव राजमुंद्री या नावानेदेखील ओळखले जात असे. राजा महेंद्रवर्मन्‌ हा इतिहासातला पहिला ज्ञात तेलुगू राजा येथे होऊन गेला. दौलैश्वरम येथे १०० वर्षे जुना आशियातील सर्वांत लांब लोहमार्ग पूल आहे. कोव्वुर, तानुकु, श्रीरामसागर प्रकल्प, पोचमपाड इत्यादी गोदावरी नदीवरील महत्त्वपूर्ण स्थळे आहेत.

आंध्रप्रदेशात दर बारा वर्षांनी पुष्करम मेळा गोदावरी तीरावर भरतो, कुंभमेळ्याप्रमाणेच याचे स्नानमाहात्म्य सांगितले जाते.


भौगोलिक

सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाटात १,०६७ मीटर उंचीवर सुरू होणाऱ्या गोदावरीचा प्रवास मुख्यत्त्वे दख्खनच्या पठारावरून साधारणत: आग्नेय दिशेने होतो. आंध्रप्रदेशात भद्राचलम्‌नंतर गोदावरी पूर्वेच्या निमुळत्या डोंगर रांगांतून(पापी टेकड्या) पुढे सरकते. या ठिकाणी तिची रुंदी २०० मीटरपेक्षा कमी तर खोली ६० फुटाच्या आत एवढीच असते.

गोदावरी खोरे ३,१२,८१२ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. त्यांतील महाराष्ट्रात १,५२,१९९ चौरस किलोमीटर, आंध्र प्रदेश ७३,२०१ चौरस किलोमीटर, मध्य प्रदेश ६५,२५५ चौरस किलोमीटर, ओरिसात १७,७५२ चौरस किलोमीटर तर कर्नाटकात गोदावरीने व्यापलेले खोरे ४,४०५ चौरस किलोमीटर आहे.

गोदावरीचा त्रिभुज प्रदेश ५,१०० चौरस किलोमीटरचा असून अत्यंत सुपीक समजला जातो. तज्ज्ञांच्या मते या त्रिभुज प्रदेशाच्या उत्क्रांतीचे तीन मुख्य टप्पे असून शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये गाळाचे प्रमाण जमिनींचा शेतीकरिता वाढता वापर व वाढत्या जंगलतोडीमुळे वाढल्याचे दिसून येते.


ऐतिहासिक, धार्मिक, आख्यायिका

प्रवरेकाठी पाषाण युगापासून गोदावरी खोऱ्यात मानवी वस्ती असावी व हडप्पा संस्कृतीला समकालीन अश्या संस्कृतीचा उगम या खोऱ्यात झाला असावा, असे दैमाबाद येथे झालेल्या उत्खननांनंतर इतिहासतज्ज्ञांचे मत झाले.

रामायण काळात प्रभू रामचंद्रांनी वनवासकाळात गोदावरी तटावर आश्रम बांधला होता असे समजतात. अर्थात गोदावरीच्या संपूर्ण प्रवाह क्षेत्रात ते ठिकाण नेमके कोणते, याचा काही पुरावा उपलब्ध नाही. नदीकाठची अनेक गावे सारखाच वारसा सांगतात.

एका आख्यायिकेत गौतम ऋषींच्या हातून चुकीने घडलेल्या गोवधाचे प्रायश्चित्त म्हणून, शंकराच्या इच्छेने अवतरलेल्या गंगेत स्नान करून ऋषींनी पाप धुतले अशी कथा आहे. आणि ही अवतरलेली गंगा म्हणजेच गोदावरी असा समज आहे. ही आख्यायिका नदी अवतरण्यापूर्वी पडलेल्या २४ वर्षांच्या दुष्काळाचे वर्णन करते.

त्र्यंबकेश्वराजवळ कुशावर्त, ब्रह्मगिरी व गंगाद्वार ही पवित्र स्थाने आहेत.

अहिल्या, गंगा, वैतरणा या उपनद्या ब्रह्मगिरीवर उगम पावतात व त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीस मिळतात.

ऐतिहासिक काळात पैठण व राजमहेंद्री येथे विविध राजवटींनी प्रदीर्घ भरभराटीचा काळ पाहिला. नजीकच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासात गोदावरी खोऱ्यात मुख्यत्वे मोगल व निजामाची राजवट होती. स्वातंत्र्योत्तर काळात निजामाने स्वतंत्र भारतात संलग्न न होता आपले वेगळे राष्ट्र निर्मिण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा घाट घातला होता. परंतु कॉँग्रेस व आर्य समाजाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्तिसंग्राम नेटाने चालवला. भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेलांद्वारे केलेल्या पोलीस कारवाईनंतर हा भाग स्वतंत्र भारताशी संलग्न झाला.

इतर नद्यांशी तुलना  
एकूण लांबीत गोदावरीचा जगात ९२वा क्रमांक आहे. ६,६९० किलोमीटर लांबी असलेली आफ्रिका खंडातील नाईल नदी प्रथम क्रमांकावर आहे. तर सिंधू नदी ३,१८० कि.मी. लांबीसह २१व्या क्रमांकावर आहे. ब्रह्मपुत्रा २,९४८ कि.मी.(२८वा क्रमांक), तर २,५१० कि.मी. वाहून गंगा ३९वा क्रमांकावर येते. यमुना १,३७६ कि.मी., सतलज १,३७० कि.मी. लांबीच्या आहेत व अनुक्रमे १०२ व १०३ क्रमांकांवर आहेत. कृष्णा १,३०० कि.मी. वाहून ११४व्या तर १,२८९ कि.मी. वाहून नर्मदा ११६व्या क्रमांक वर येते. १,००० कि.मी. पेक्षा अधिक लांबीच्या जगात सुमारे १६० नद्या आहेत.

गोदावरी वरील काही सिंचन प्रकल्प
नाशिक व मराठवाडा मिळून ६६ लाख हेक्टर शेतीयोग्य जमिनींपैकी १६ टक्के क्षेत्रास सिंचनाचा फायदा झाला आहे तर अधिकतम प्रलंबित क्षमता २९ टक्के एवढी आहे.

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाने किमान १,३२,००० हेक्टर जमीन भिजणे प्रस्तावित होते परंतु प्रत्यक्षात ४५,००० हेक्टर जमीनच सिंचनाखाली येऊ शकली. विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प (आशियातला सर्वांत मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प - नांदेड) मराठवाडा विभागात सर्व प्रकल्प मिळून ४८,००,००० हेक्टर शेतजमिनींपैकी ८,००,००० हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. याशिवाय गोदावरीवर गंगापूर, नांदूर, मधमेश्वर (इ.स.१९०७), भावली(प्रस्तावित), वाकी(प्रस्तावित), भाम, मुकणे, अलिसागर - निझामाबाद पूरकालीन उपसा सिंचन प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प - पोचमपाड, पोलावरम प्रकल्प (प्रस्तावित) इत्यादी प्रकल्प आहेत.

Comments

Popular posts from this blog

ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्रातील जिल्हे व नद्या